कोल्हापूर : ‘अत्यंत त्यागमय भावनेने कष्टाळू वृत्तीने विद्यार्थी घडवणारा शिक्षक समाज घडवत असतो. आज शिक्षणाचे स्वरूप बदलले आहे आणि शिक्षकाच्या कामाचे स्वरूपही बदलले आहे. शिक्षण संस्था व्यावसायिक झाल्या आहेत आणि शिक्षकाच्या व्रतस्थपणाचेदेखील व्यावसायिक पेशात रूपांतर झाले आहे. या शिक्षण व्यवस्थेतील खरा शिक्षक विद्यार्थ्याची जडणघडण करताना समाज आणि संस्कृतीचे पालकत्व स्वीकारत असतो,’ असे विचार विवेकानंद कॉलेजचे मराठी विभाग प्रमुख डॉ. डी. ए. देसाई यांनी व्यक्त केले.
महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे शिक्षक दिन व महाराष्ट्र विवेक वाहिनीचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. वाय. होनगेकर होते.
आजचा विद्यार्थी, शिक्षण व्यवस्था आणि सामाजिक बदल यावर देसाई यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ‘विद्यार्थ्यांच्या अनेक पिढ्या घडवणारा शिक्षक आदर्श जीवनाचे प्रतीक असतो. संस्कारक्षम विद्यार्थी घडवण्याचे व समाजाला विचार करायला लावण्याची क्षमता शिक्षकामध्ये असते. समाजातील अंधकार दूर करून माणूस घडवण्याचे कार्य शिक्षकाने केले पाहिजे.’
प्राचार्य होनगेकर म्हणाले, ‘शिक्षकांनी दिलेल्या ज्ञानाविषयी आदरभाव व्यक्त करण्याकरिता शिक्षक दिन साजरा केला जातो. जी माणसे गुरूंवर श्रद्धा ठेवतात ती मोठी होतात. यासाठी सर्व गुरुदेव कार्यकर्त्यांनी समाज परिवर्तन घडवणारी सुसंस्कार अशी विद्यार्थ्यांची पिढी तयार करणे ही आजच्या समाजाची खरी गरज आहे. यासाठी शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांचा ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार हा मूलमंत्र सर्वांनी अंगी बाणवून शिक्षणाचे उद्दिष्ट साध्य केले पाहिजे.’
या प्रसंगी शुभदा मगदूम, राकेश खोत यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वृक्षाला पाणी घालून करण्यात आली. प्रास्ताविक आणि पाहुण्यांचे स्वागत राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. व्ही. सी. महाजन यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. एस. डी. जोशी यांनी करून दिला. सुषमा इंगळे व सिमरन घुडूभाई यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. वाय. डी. हरताळे यांनी आभार मानले. या वेळी ‘एनएसएस’चे विद्यार्थी, प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.